Maharashtra Flood Aide: राज्यात अतिवृष्टीने गेल्या काही दिवसांपासून कहर घातला आहे. राज्यात मराठवाड्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेताची अक्षरक्षः राखरांगोळी झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना पुन्हा उभे रण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानुसार, अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून म्हणजेच डीपीडीसीतून निधी देला जाणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पूरग्रस्त भागांमध्ये मदतीच्या निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्राप्त होत निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयानुसार, एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या 5 टक्क्यांपर्यंत रक्कम अतिवृष्टी, गारपीट किंवा पूरग्रस्त भागांमध्ये वापरला जाईल. यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती. या निर्णयाचा मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याला मोठा लाभ होईल.
राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घतले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पावसाने जनजीवन विस्कळीत केलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून अख्खी शेती पाण्यात वाहून गेल्याची स्थिती आहे. शासनस्तरावर या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु आहे. मात्र, नुकसानीची तिव्रता लक्षात घेता मदत वेळेवर मिळत नसल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पंचनाम्याच्या तुलनेत नुकसान मोठ्याप्रमाणत आहे. मात्र, शासकीय निकशामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करीत भरीव मदत शासनाने द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.