Bhusawal News: भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न सुरु असताना भुसावळात मात्र या प्रयत्नांना काळे फासले जात आहे. या ठिकाणी 73 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी, कोतवाल आणि पंटर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी रंगेहाथ पकडले आहे. वाळू वाहतुकीस परवानगी तसेच कारवाई टाळण्यासाठी ही लाच स्विकारली जात होती. विशेष म्हणजे पथकाने ही कारवाई भुसावळ तहसील कार्यालय, यावल नाका परिसरात केली. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची अवैध वाहतूक सुरु असते. अशात वाळू वाहतुकीस परवानगी तसेच कारवाई टाळण्यासाठी महसूल विभागात काही दलाल कार्यरत आहे. या दलालांच्या मध्यस्थीने अवैध गौण खनिज वाहतूक राजेरोसपणे सुरु असते. अशातच वाळू वाहतूक परवाना आणि कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून तहसीलदार नीता लबडे यांच्या नावाने 80 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. मात्र, तक्रारदाराने 80 हजार रुपये देण्यास नकार दिल्याने तडजोडीनंतर 73 हजार रुपयात डील फायनल झाली. त्यानुसार, ठरलेली रक्कम देण्यासाठी तक्रारदार तहसील कार्यालयाजवळ, यावल नाका येथे पोहचले. तक्रारदाराने आधीच तक्रार दिलेली असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पठकाने नियोजनानुसार सापळा रचुन ठोवला होता.
त्यानुसार, लाचखोर ही रक्कम स्वीकारताना पथकाने धाड टाकत तिघांनाही ताब्यात घेतले. या लाचखोरांमध्ये वराडसीमचे तलाठी नितीन पंडितराव केले, कठोऱ्याचे कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव आणि तिघ्रे (साकेगाव) येथील खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी यांचा समावेश आहे. सदरची कारवाई ACB जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान, तहसील कार्यालयाच्या जवळच हा लाचखोरीचा कांड उघड झाल्याने महसूल विभागाच्या कार्यशैलीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. एकीकडे गौण खनिजाची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या लोचटपणामुळे शासनाच्या प्रयत्नावर पाणी फेरले जात असल्याची स्थिती आहे.




